आपण नेहमी काही अशा व्यक्ती पाहतो
कि ज्या आपल्या जीवनात सुखी आहेत, कारण त्या त्यांच्या व्यवसायावर प्रेम करतात.
जेव्हा एखादी व्यक्ती आपला व्यवसाय स्वेच्छेने निवडते तेव्हा ती समाधानी असते. अशा
व्यक्तींना कधी कधी मोठे यश मिळविण्यासाठी योग्य संधीची वाट पहावी लागते.
सध्या अतिशय नावाजलेले कलाकार नंदू माधव हे अशा व्यक्तिंपैकीच एक आहेत. २५
वर्षापूर्वी त्यांनी रंगमंचाद्वारे कलाक्षेत्रात प्रवेश केला. नंतर त्यांना
त्यांच्या अभिनयाची योग्य दादही मिळाली, पण नावलौकिक व किर्ती मिळविण्यासाठी
त्यांना २५ वर्षे वाट पहावी लागली.
'हरिश्चंद्राची फॅक्टरी' ह्या
चित्रपटाच्या प्रकाशनानंतर मात्र त्यांच्या नावाची चर्चा सगळीकडे जोरात सुरू झाली.
दादासाहेब फाळकेंची भूमिका साकारण्याचा योग जुळून आला आणि नंदू माधव एक सिनेकलाकार
म्हणून ओळखले जाऊ लागले. चित्रपटाच्या प्रकाशनानंतर पहिल्याच दिवशी
मराठीमुव्हीवर्ल्डशी त्यांनी मारलेल्या गप्पा.
 |
दादासाहेबांची भूमिका साकार
करण्यासाठी तुम्ही स्वत:ला कसे तयार केले?
- ही भूमिका स्विकारल्यानंतर मी या
व्यक्तिरेखेची इतिहासातली लांबी- रुंदी मापायला सुरुवात केली. दादासाहेबांच्या
काही विशिष्ट लकबी यांचा अभ्यास, त्यांचे चालणे- बोलणे, हे सर्व अभ्यासल्यानंतर
वेगळे असे काय करावे हे सारखे मला भेडसावत होते. ते दोन तर्हेचे चश्मे वापरत, मग
आपण वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी ठेवले तर? म्हणून मी एक चश्मा गळ्यात अडकविला व
दुसरा डोक्यावर ठेवला. बाकी जे काही डायरेक्टरने सांगितले तसे मी करत गेलो. |
तुमच्या शैक्षणिक व व्यवसाईक पार्श्वभूमिबद्दल काही सांगाल?
- माझं
बालपण महाराष्ट्रातील बीड तालुक्यात गेलं. नंतर औरंगाबादला मे विज्ञानाची पदवी
घेतली व लगेच विधी महाविद्यालयाचीही पदवी प्राप्त केली. मात्र सनद न घेता मी
कलाक्षेत्राकडे वळलो- ते एक स्टेज कलाकार म्हणून. आजपर्यंत मी एक कलाकार म्हणूनच
बाबरत आहे.
तुमच्या 'वाडा चिरेबंदी' या प्रसिद्ध नाटकातील अभिनयाबद्दल
बरेच ऐकले आहे. तर त्याबद्दल काही सांगाल?
- खरे म्हटले तर 'वाडा चिरेबंदी' हे
नाटक कालानुसार मोठ होत गेल. वेगवेगळ्या नावांनी त्याचे अजून दोन भाग लिहीले गेले.
त्यामध्ये सलगता होती. हे सर्व एकत्र करुन नाटक ९ तासांचे झाले. मला तिनही
भागांमध्ये काम करण्याचा मौका मिळाला. शेवटच्या भागात तर मी प्रौढ भूमिकेत होतो.
जेणेकरुन मला या नाटकाद्वारे एक वेगळाच आनंद मिळाला.
एक पूर्णवेळ कलाकार
असल्याकारणाने तुम्हाला कधीतरी ब्रेक घ्यावा लागलाच असेल. तेव्हा तुम्ही काय
केलं?
- या ब्रेक पिरीयडमध्ये सुद्धा मी कलेशी संबंधीत गोष्टी केल्या. उदा एका
फ्रेंच कंपनीसाठी भारतीय चित्रपटात काम केलं. तसेच डॉक्युमेंटरी फिल्मसही बनवल्या.
काही हिंदी चित्रपटामध्येही भूमिका केल्या. 'दायरा', 'दर्पण के पिछे', 'जिस देश मे
गंगा रहता है' इ.
'हरिश्चंद्राची फॅक्टरी'च्या शुटिंगच्या वेळी आणि नंतर
घडलेल्या काही अविस्मरणीय घटनांबद्दल काही सांगाल?
- या चित्रपटाच्या
चित्रीकरणाचा प्रत्येक क्षणच अविस्मरणीय होता. जेव्हा हा चित्रपट प्रकाशनापूर्वी
इतर फिल्म फेस्टिवलमध्ये दाखविला गेला तेव्हा अशा काही घटना घडत होत्या, ज्या
वेगवेगळ्या लोकांच्या अभिप्रायामुळे आम्हाला सुखावत होत्या. कलकत्त्याला तर सौमित्र
चटर्जी यांनी चित्रपट संपल्यावर मला येऊन मिठीच मारली. अनेक चित्रपट समिक्षकांनी हा
चित्रपट एक माध्यम म्हणून कसा वापरला जाऊ शकतो याबद्दल चर्चा केली की जी
लोकांपर्यंत पोहचू शकेल.
नंदू माधव हा कलाकार 'हरिश्चंद्राची फॅक्टरी'
नंतर प्रकाशझोतात आला. हे खर का?
- अस तुम्ही समजत असाल, पण मी मात्र १९८५ पासून
स्वतःला या क्षेत्रात झोकून दिले आहे. त्यामुळे खरी प्रसिद्धी केव्हा मिळाली. हे
तुम्हीच ठरवा. मी फक्त माझे काम आजपर्यंत चोख करत आलो आहे.
पण यापुढे
नंदू माधव आम्हाला एक बिझी कलाकार म्हणून मराठी आणि बॉलिवूड चित्रपटात दिसणार
का?
- अशी आशा करुया.
|
|