मुंबईतील तुर्भे भागातील 'एस्सेल'
स्टुडिओमधील चित्रीकारणानिमित्त तेथे असलेल्या सर्वांचीच लगबग सुरु होती. आणि आमच्या समोर आला.
तो एक तृतीयपंथी. प्रारंभी आम्ही त्याला ओळखलेच नाही. परंतु जेव्हा त्या तृतीयपंथीयाचा
'हे मिलिंद गवळी' असा परिचय करून देण्यात आला तेव्हा आम्हाला आश्चर्य वाटल्या खेरीज
राहिले नाही. मिलींद गवळी आणि तृतीयपंथी? हे काय गौडबंगाल आहे?
हे गौडबंगाल आहे 'आम्ही का तिसरे?' या नव्या मराठी चित्रपटातील. त्यामध्ये अभिनेता
मिलिंद गवळी 'हिरो'च्या भूमिकेत आहे मात्र हा हिरो आहे चक्क 'तृतीयपंथी'.
तृतीयपंथीयांच्या जीवनावर केवळ प्रकाशझोत टाकण्यासाठी नाही तर त्यांच्याबाबत
सामाजिक जागृती व्हावी या उद्देशाने या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. 'शुभलक्ष्मी
चित्र' च्या 'आम्ही का तिसरे ?' या चित्रपटाची निर्मिती अभिनेत्री अलका कुबल व
शिल्पा मसुरकर यांनी केली असून दिग्दर्शक आहेत 'चॅम्पियन' फेम रमेश मोरे.
तृतीयपंथीयांच्या समाजजीवनावर प्रकाशझोत टाकणारा मराठीतील पहिलाच चित्रपट असेल.
सुप्रसिद्ध साहित्यिक रणजीत देसाई यांच्या कन्या श्रीमती पारू नाईक यांनी अनेक वर्षे
संशोधन करून लिहिलेल्या 'मी का नाही?' या कादंबरीवर हा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या
चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे.