आजच्या धावत्या जगात नि़खळ मैत्री अनुभवणे तसे कठीण, मात्र मैत्री संपली असे महणता
येणार नाही. काळानुरुप मैत्रीची व्याख्या बदलली असली तरी नात्यातील पावित्र्य मात्र
संपलेले नाही. अशाच नात्याची कथा डॉ. बालाजी तांबेंच्या कथा- संकल्पनेतून
साकारलेल्या "मिशन दोस्ती डॉट कॉम" या आगामी मालिकेत मांडण्यात आली आहे. या अतिशय
वेगळ्या धाटणीच्या मालिकेची निर्मिती शोभा आणि एकता कपूर यांच्या बालाजी
टेलिफिल्म्स"ने केली असून २८ मे पासून दर सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता 'साम
टिव्ही' वर सुरु होत आहे.
मैत्रीच्या बदलत्या संदर्भांसह दिग्दर्शक रविंद्र करमरकर या मालिकेच्या निमित्ताने
एक त्रिकोणी प्रेमकथा घेऊन आले आहेत. डीजे, संजना आणि रागिणी या तीन पात्रांभोवती
या मालिकेचे कथानक गुंफण्यात आले आहे.
या मालिकेत वृषसेन दाभोळकरने डीजेची मुख्य भूमिका साकारली आहे तर मानसी कुलकर्णी
यात रागिणीच्या भूमिकेत आहे तर अनुराधा राजाध्यक्ष मीरा बनली आहे. याशिवाय राजन
ताम्हणे, सुमुखी पेंडसे, प्रफुल्ल सामंत आदींच्या भूमिका या मालिकेत आहेत.
मालिकेची मुळ संकल्पना आणि कथा डॉ. बालाजी तांबेंची आहे. पटकथा आणि संवाद समीर
हेमंत जोशींनी लिहीले आहे. प्रोजेक्ट हेड सुरेश पै असून ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की
यांनी यांनी या शिर्षक गीताला संगीत दिले आहे.
|