अग्निदिव्यः
नियतीचा लपंडाव
चि. त्र्यं. खानोलकर यांच्या 'अगोचर' या साठच्या दशकातील
कादंबरीवरील हा चित्रपट खानोलकरांचे त्या काळातील कोणतेही लेकन झपाटून
टाकणारे असे. 'अगोचर' ही त्यापैकी एक कथा. कोकणातील एका खेडयात घडणारी.
आनंदराव देसाई (मोहन जोशी) यांच्या वाडयात घडणारी. देसाई यांचा गावात इतका
दरारा आहे की कोणीही त्यांच्याविरुद्ध ब्र काढू शकत नाही. त्यांच्या वेडसर
लहान भावाचे अच्युतचे (सुबोध भावे) लग्न ते नंदिनी (नेहा पेंडसे)शी ठरवतात,
तेव्हा त्यांच्या तरुण मुलाला तातूला (अमेय वाघ) वाटते की ही आपली व्हावी.
त्यातून कहर म्हणजे दाखविण्याच्या प्रसंगी हाच नवरा मुलगा असे तिला वाटते.
पण लग्न होत असताना हा वेडसर मुलगा तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो. पहिल्या
रात्री तिच्या खोलीत कोण शिरतो तर आनंद. त्याची पत्नी वहिनीबाय (रीमा)
आपल्या पतीच्या सर्व प्रवृत्ती जाणून असते. ती नंदिनीला त्याच्या
वासनाजालातून वाचवते. तातू दारुच्या आहारी जातो. अच्युतचं वेडेपण जाऊन तो
माणसात कसा येईल याची चिंता नंदिनी करत असते.
|
 |
आनंदरावाला गावात एकच खमक्या विरोधक असतो तो
म्हणजे दादूभट (मोहन आगाशे) तो गावच्या विठोबाचा पुजारी असतो. आपल्या कृष्ण
कृत्यांना लपवण्यासाठी आनंदराव आपल्या घरात स्वामींना आणून ठेवतो. (चित्तरंजन
कोल्हटकर) स्वामी हे सर्वांची दु:खे आपली मानतात. त्यातून आनंदरावांचा
कुटिल हेतू साध्य न होता नियती त्यांच्या विरुद्ध जाते. स्वामींच्या
सहवासात अच्युत शहाणा होत जातो. अनेक उलटसुलट घटनांनंतर वाडा भस्मसात होतो.
वासनाच जळून जातात जणू. या कथेचे चित्रपटात रुपांतर करताना पटकथालेखक राज
काझी व दिग्दर्शक अजित शिरोळे यांचे कौशल्य पणास लागले आहे. |
| काही ठिकाणी
प्रसंग खूप तणावपूर्ण करण्याच्या नादात प्रेक्षकांना फारच गृहीत धरले आहे.
वेडया महिलेची गरज होतीच का?, त्याशिवाय परिणाम साधता आला नसता का? यातील
मोहन आगाशे यांची भूमिका सर्वात लक्षवेधी झाली आहे. नवी नायिका नेहा पेंडसे
हिने नंदिनीच्या भूमिकेचा तोल चांगला सांभाळला आहे. एक समर्थ कथा चित्रीत
अवस्थेत पाहताना तिचे सादरीकरण समर्थ कलावंतांनी केले असल्याचे समाधान वाटत
रहाते. |