मुल दत्तक घेण्यावरुन आत्तापर्यंत बरेच मराठी चित्रपट आले पण जर
दत्तक घेतलेले मुल काही कालावधीनंतर मंदबुद्धी बालक असल्याचे कळले तर त्याचा
परिणाम दत्तक घेणार्या दांपत्यावर कसा होतो या गोष्टीची जाणिव करुन देणारा
चित्रपट म्हणजेच 'झाले मोकळे आकाश'
चित्रपटातील तरुण जोडपे समीर (सुबोध भावे) आणि नेहा (पल्लवी वैद्य) यांना
बरीच वर्षे मुल होत नसते. नेहाच्या हट्टापायी समीर मुल दत्तक घेण्यास तयार
होतो. पण जेव्हा काही दिवसांनी डॉक्टरांच्या तपासातून त्याला हे कळते की
त्यांनी दत्तक घेतलेली (मुलगी) बाहुली ही मतिमंद बालक आहे तेव्हा मात्र
समीर खुपच अस्वस्थ होतो. नेहा मात्र स्वतःला सावरुन एका आदर्श मातेप्रमाणे
आपल्या बाहुलीची योग्य काळजी घेते. |
 |
बाहुली जसजशी मोठी होते, तसा समीर तिचा
जास्तच राग करतो. एके दिवशी तर तो चक्क टोकाची भूमिका घेतो; ज्याचा त्याला
नंतर पश्चाताप होतो. सात वर्षांची बाहुली आपल्या हुशारीद्वारे एक दिवस
समीरचे मन जिंकते. कर्तृत्ववान बाहुलीला चित्रपटात रोल मिळवून देण्यासाठी
निर्मात्याच्या रुपात शरद पोंक्षे येतो. सर्व काही सुरळीत चालले असताना
बाहुलीची जन्मदाती आई अवतरते आणि तिही एका सिनेतारकाच्या रुपात. बाहुलीच्या
कस्टडीचा प्रश्न कोर्टापर्यंत जातो. डिफेन्स लॉयरच्या रुपात रमेश भाटकर
प्रवेश करतो आणि चित्रपटास वेगळेच वळण मिळते. |
तर अशा या
दर्दपूर्ण कहाणीची मांडणी
दिग्दर्शक राजेंद्र अनंत आणि योगेश महाजन यांनी योग्यप्रकारे केली आहे.
सुबोध आणि पल्लवीचा सुरेख अभिनय व त्याला इतर कलाकारांची साथ यामुळे
चित्रपट वास्तववादी बनला आहे. एक चांगला संदेश या चित्रपटाद्वारे
लोकांपर्यंत पोहोचतो. काही शुल्लक त्रुटी वगळता हा चित्रपट योग्य प्रकारे
हाताळला आहे. संगीतात विशेष असे काही नाही. फक्त एक लहान मुलांवर चित्रित
गाणे योग्य वाटते.
दिग्दर्शकाने चित्रपट अत्यंत प्रगल्भ, संवेदनशील पातळीवर हाताळला आहे.
बॉक्स ऑफिसवर चित्रपट यशस्वी व्हायला हरकत नाही....
|