काळ बदलला, जग बदलले तरीही काही गावे
नकाशावर तशीच राहतात, त्यांच्यावर न सुधारलेल्या रस्त्यांच्या खुणा ना
सुधारलेल्या माणसांच्या खुणा. वर्ष न वर्षे ही गावे अशीच राहतात, परंपरांना
चिकटून....पूर्वापार चालत आलेल्या या रूढी, प्रहता, परंपरा माणसाला आतून
फक्त पोखरत जातात...त्याच्या नकळत. माणसाचे निसर्गदत्त स्वातंत्र्यही
हिरावून घेतले जाते बर्याचदा.
जोगवा ही अशीच एका नष्ट होण्याऐवजी लोणच्याप्रमाणे मुरत चाललेल्या प्रथेची
कथा. ही कथा आकाराला येते महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सिमेवरील गडहिंग्लज
नावाच्या एका छोट्याशा खेड्यात. सुली
नावाच्या एका मुलीला देवदासींच्या घेऱ्यात सापडलेल्या या गावात तिच्या
मनाविरुद्ध अडकवले जाते कायमचे. अंधश्रद्धेचा हाही एक बळीच. खरेतर पैसा
कमवण्याचे हे भांडवल जे इथल्या नागरिकांना नैतिक-अनैतिकतेच्या काळजीपेक्षा,
माणुसकीपेक्षा जास्त महत्वाचे वाटते.
|
 |
सुली ही पुढे देवदासीपण स्वीकारत जगतेही, पण एका अनोळखी माणसाच्या प्रेमात
पडून सर्वसाधारण मुलीसारखेही जगू पाहते. येल्लामा देवीसाठी चाललेला हा खेळ
तयाप्पाच्याही वाट्याला येतो त्याच्या इच्छेविरुद्धच...तय्याप्पाला त्याच्या
वडिलांनी जोगता म्हणून देवीच्या हवाली केलेले. सुलीच्या केसांमधली जटा आणि
तयाप्पाच्या मुत्रामधून वाहणारे रक्त त्यांना येल्लाम्माच्या पायाशी जगायला
कारणीभूत होते....गावाच्या समजुतीप्रमाणे....
ज्या अनोळखी माणसाच्या प्रेमात ती पडते तो पुढे लग्नाचा विषय निघताच हात वर
करून मोकळा होतो आणि सुली फसते. तयाप्पाचे |
तिच्यावर मनापासून प्रेम असते पण
तो व्यक्त करू शकत नसतो. पुढे दोघेही लग्न करतात जे समाजाला मान्य नसते.
सर्वसाधारण माणसांप्रमाणे जगण्याचा हिरावून घेतला गेलेला हक्क या आजच्या
काळात मनस्वी चीड आणणारा ठरतो. जोगवा सर्वे सूत्रे समान धाग्यात बांधत कथा
वास्तवाचे काठ सांभाळत फुलवतो. इथे आणखी एक पात्र लक्षात राहते ते एका
शिक्षकाचे. ह्या सगळ्या वाईट प्रथांना नाकारत नागरिकांना त्याबाबत सतत
समजून सांगणारा हा शिक्षक सरकार जोग्त्या आणि जोग्तीनींचे पुनर्वसन करतेय
याचीही माहिती देत राहतो. अर्थात चिवट नागरिक त्याच्या प्रयात्नांना फोल
ठरवतात, मात्र त्यांच्या मदतीने फक्त दोन तरुण जोग्त्या आणि जोग्तीनीला
आपल्या स्वतंत्र आयुष्याचा मार्ग मिळवता येतो. देवीला मनाची भक्ती लागते,
शरीराचे त्याग्त्व नाही हे पटवून द्यायला तो शिक्षक असमर्थ ठरतो. मुक्ता
बर्वे (सुली), उपेंद्र लिमये (तयाप्पा) आणि इतर कलाकारांनी आपापल्या
भूमिकांना व्यवस्थित न्याय दिला आहे. अजय अतुलचे संगीत असलेले एकच गाणे यात
आहे पण मनाला स्पर्श करून जाणारे.
राजीव पाटील यांचे दिग्दर्शन डोळ्यात भरण्याजोगे. सर्वात प्रभावी ठरलेय ते
संजय जाधव यांनी केलेले चित्रपटाचे छायाचित्रण. प्रत्येक सीन हा
चित्रपटाच्या साखळीत अगदी चपखलपणे बसतो.
संवेदनशील, उत्कट प्रसंगात कॅमेरा अतिशय नाजूकपणे हाताळल्याने ते प्रसंग
अपेक्षित परिणाम साधतात. कर्नाटकातल्या गावाचा फील सुद्धा चित्रपटाची
दृश्यात्मक उंची वाढवतो. एकंदर चित्रपट कितीही गंभीर विषयावर असला तरी तो
साधेपणाने मांडल्याने प्रेक्षकाला रटाळवाना वाटत नाही, उलट त्यावर विचार
करायला लावतो, काही मनाला भिडणारे प्रश्न उभे करतो.
दिग्दर्शकाने चित्रपट अत्यंत प्रगल्भ, संवेदनशील पातळीवर हाताळला आहे.
बॉक्स ऑफिसवर चित्रपट यशश्वी व्हायला हरकत नाही....
|