मराठी चित्रपट सृष्टीला प्रतिभेची वानवा कधीच भासली नाही. अगदी रमेश देवांपासुन आजच्या भरत जाधव पर्यंत अनेक तारे इथे जन्माला आले. आर्थिक पाठबळ आणि प्रसिद्धीच्या अभावी प्रत्त्येकाला आपली क्षमता दाखवायची संधी मिळालीच असे ही नाही. पण प्रतिभेला आर्थिक पाठबळ आणि प्रसिद्धीचे कोंदण लाभले की किती उत्त्म निर्मिती घडू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे अनुभूती आर्टस निर्मित मराठी चित्रपट 'साडे माडे तीन' होय.
या चित्रपटाची कथा तशी नवीन नाही. ही कथा आहे तीन भावांची. हे तिघे भाऊ चोवीस तास सुरु असलेले कुरळे मोटार गॅरेज चालवत असतात. तरुणपणी प्रेमात फसवला गेलेला मोठा भाऊ (अशोक सराफ) आपल्या दोन छोटया भावांना (भरत जाधव आणि मकरंद अनासपुरे) स्त्रीच्या सावलीपासूनही दुर ठेवायच्या प्रयत्नात असतो. पण अर्थातच या सार्या प्रयत्नांना फोल ठरवून भरत जाधव रात्री उशीरा गाडी दुरूस्त करायला आलेल्या एका मुलीच्या (अमृता खानविलकर) प्रेमात पडतोच. त्याच्या या प्रेमाला मदत लाभते ती मकरंद अनासपुरे आणि त्याच्यांच गॅरेजमध्ये काम करणार्या सिद्धार्थ जाधवची. मग ही प्रेमकहाणी अशोक सराफपासुन लपवण्याच्या प्रयत्नात होणार्या गमती-जमतींची कहाणी म्हणजे 'साडे माडे तीन'. या मुख्य कहाणीच्या जोडीला श्रीमंत नायिकेच्या जीवावर उठलेले खलनायकांच्या
रहस्याची मसालेदार फोडणी रसिकांना एका परीपुर्ण चित्रपटाची मेजवानी देउन जाते.
पण या रहस्याचा उलगडा इथे वाचण्यापेक्षा रसिकांनी तो पडद्यावर अनुभणे जास्त संयुक्तीक ठरेल.भरत जाधव, मकरंद अनासपुरे, अशोक सराफ, अमृता खानविलकर, अरुण नलावडे, उदय टिकेकर अशी तगडी स्टरकास्ट या चित्रपटाला लाभली आहे आणि प्रत्येकानेच आपल्या भुमीकेचे सोने केले आहे. विशेषतः मकरंद अनासपुरे, भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव या तिघांची जुगलबंदी प्रेक्षकांना खळखळून हसवते. अशोक सराफ यांनीही नेहमीच्याच सहजतेने आपली भुमीका साकारलीय. या सार्या कलावंतांना अमृता खानविलकर उत्तम साथ दिलीय. अरुण नलावडे, सुकन्या कुलकर्णी आणि उदय टिकेकर छोट्याश्या भुमीकेतही भाव खाउन जातात. अवधुत
गुप्तेचे पार्श्वसंगीत संपुर्ण चित्रपटात, विशेषतः कॉमेडी आणि सस्पेंस प्रसंगात बहार आणते. 'साडे माडे तीन' हे
शिर्षकगीत आणि 'सातशे सत्त्याहत्तर रुपये दे ना माझे' हे गीत चित्रपट संपल्यावरही प्रेक्षकांच्या ओठावर रेंगाळत रहाते.अंकुश चौधरी आणि सचित पाटिल
या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शकांच्या भुमिकेतून आपल्यासमोर आले असले तरी मुळात एक चांगले अभिनेते म्हणून ते नावजले गेले आहेत. आणि म्हणूनच दिग्दर्शकांच्या भुमीकेतही प्रत्येक कलाकाराला आपले अभिनय कौशल्य दाखवायची संधी मिळेल याची त्यांनी पुरेपूर काळ्जी घेतलीय. या चित्रपटातील छोट्यातील छोटे पात्र ही प्रेक्षकांच्या लक्षात रहाते, इथेच दिग्दर्शंकाच्या कौशल्याला मनापासून दाद द्यावी लागेल.
संजय मोने यांनीही या चित्रपटाच्या निमीत्ताने प्रथमच पटकथा लेखनाच्या क्षेत्रात यशस्वी प्रवेश केलाय.हा चित्रपट 'चलती का नाम गाडी' या सुप्रसिध्द हिंदी चित्रपटावर आधारीत असला, तरी त्याला टिपीकल मराठी टच देण्यात निर्माते, दिग्दर्शक कमालीचे यशस्वी ठरलेत आणि हेच या चित्रपटाचे मोठे यश मानावे लागेल. आजच्या ईन्स्टंटच्या जमान्यात बहुतेक मराठी चित्रपट प्रसिध्दिच्या मागे लागून 'आयटेम साँगच्या' मागे धावताना आपल्याला दिसतात. अशा वेळी संपुर्ण कुटुंबासोबत पहाता येइल असा हा चित्रपट निश्चीतपणे मराठी चित्रपटरसिकांना निखळ आनंद देउन जातो. |