जगप्रसिद्ध ग्रीक तत्त्ववेत्ता सॉक्रेटीसने म्हटले आहे "समाधानी वृत्ती हीच खरी
संपत्ती व उसनी बडेजावी वृत्ती म्हणजे एक प्रकारचे मानसिक दारिद्रयच !" याच
तत्त्वज्ञानावर आधारित आहे 'तार्यांचे बेट' हा निर्माती एकता कपूर व शोभा कपूर
यांचा पहिला वहिला मराठी चित्रपट! या चित्रपटात जागतिकीकरण आणि त्याचे साध्यासुध्या
कुटुंबावर होणारे परिणाम,. या संवेदनशील विषयाची रचना केली आहे.
प्रत्येक मनुष्याची स्वतःची अशी काही स्वप्ने असतात पण नशीबाने जेवढे त्याला दिले
त्यावरच तो समाधान मानण्याचा प्रयत्न करतो. परंतु काही वेळा दुसर्याला दिलेल्या
वचनांची पूर्ती करण्याचे ओझे जर त्याला उचलावे लागले तर त्याची काय अवस्था होऊ शकते
हेच जणू या चित्रपटात दर्शविण्यात आले आहे.
|
आजची नवी पिढी स्वतःला हव्या असलेल्या गोष्टींबद्दल अतिशय स्पष्टवक्ति व ठाम आहे.
परीक्षेची तयारी मुलानी चांगली करावी म्हणून त्यांना काहीही वचने देणारे आईवडिल आपण
पाहतोय. परंतु कित्येकवेळा असे वचन पुरे करणे त्यांच्या आवाक्या बाहेरचे असते आणि
मग त्याचे पर्यवसान लाचलुचपत स्विकारण्यापर्यंतही होऊ शकते. याच विषयावर आधारीत आहे
' तार्यांचे बेट' चे कथानक. FTII चे सौरभ भावे यांनी लिहिलेली ही कथा आहे तशी
साधीसोपी परंतु आपल्यापैकी प्रत्येकाला ती जवळची वाटते. दिग्दर्शक किरण यज्ञोपवित व
नीरज पांडे (हिंदी चित्रपट 'वेन्स्डे' चे दिग्दर्शक) यांनी पटकथेवर खुप्प मेहनत
घेऊन ती मनोरंजकही केली आहे व त्यातून समाजाला सूज्ञ संदेशही दिला आहे.
चित्रपट जरी जीवनातील प्रखर सत्यावर प्रकाश टाकीत असला तरी तो क्लिष्ट न
होता त्यात जागोजागी नर्मविनोदही पेरलेले आहेत. सचिन खेडेकर हे एका
ग्रामपंचायतीचे कर्मचारी काही कामानिमित्त
|
 |
सहकुटुंब मुंबईला येतात. तिथे
त्यांच्या १० वर्षाच्या ओंकार या मुलाला शहरी जीवनाची भूरळच पडते. एका
पंचतारांकित हॉटेलला भेट देण्याचा तो हट्टच करतो पण वडील ते परवडणारे नाही
म्हणून नाकारतात. अखेर त्याच्या हट्टापुढे नमते घेऊन त्याला वचन देतात कि
तू शाळेतून पहिला आलास तर आपण त्या हॉटेलात जाऊन राहू. इथेच सुरु होते
जिंकण्याची जिद्द आणि दोघानाही जीवनातील कटू सत्याला सामोरे जावे लागणे, या
सर्व संघर्षामध्ये ओंकारची आई (आश्विनी गिरी), आजी (शुभांगी जोशी) व बहिण (अस्मिता
जोगळेकर) याही आपापल्या परिने सामील होतात. एका एका प्रसंगात तर मुलाचे
फाजील हट्ट पाहून आई त्याच्या थोबाडीत देते तर नवर्याला अनैतिक मार्गाने
मिळवलेल्या उत्पन्नाबद्दल जाब विचारते. 'मेहनतीने मिळविलेला पैसाच आपल्याला
लाभतो' हे तिचे विधानही अखेर खरे ठरते.
पितापुत्र मुंबईत परत जाण्यासाठी निघतात हा अखेरचा प्रसंगही दिग्दर्शकाने
अत्यंत खुबीने रंगविला आहे व तो प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. थोडक्यात 'तार्यांचे
बेट' आपले केवळ मनोरंजनच करत नाही तर सामाजिक संदेशही देऊन जातो. सचिन
खेडेकरांचा सहजसुंदर समर्थ अभिनयाला आश्विनी गिरी यानी पत्नीच्या भूमिकेत
चांगली साथ दिली आहे. अन्य कलाकारांनीही आपापल्या भूमिका योग्य वठवल्या
आहेत. पण ईशान तांबे याने वठवलेला ओंकार मनावर चांगलाच ठसून जातो. सुधीर
पळसाने यांची फोटोग्राफी मनोवेधक आहे.
एकंदरीत दिग्दर्शन, कथा, अभिनय, सामाजिक जाणीव, मनोरंजन, चित्रण या सर्वच
स्तरांवर 'तार्यांचे बेट' प्रेक्षकांच्या पसंतीला उतरेल यात वाद नाही.
|