मराठी चित्रपटसृष्टीत सध्या विनोदी चित्रपटांचे वारेमाप पिक आलय. विनोदी चित्रपटांची ही शैली सुरुवातीला प्रचंड यशस्वी ठरली असली तरी एकाच पठडीतील रटाळवाणे विनोद मांडणार्या या चित्रपटांकडे आजचा खरा रसिक प्रेक्षक पाठ फिरवत असल्याचे चित्र आपल्याला पहायला मिळते. या पार्श्वभुमीवर आलेला 'उमेश कुलकर्णी' दिग्दर्शित 'वळु' हा चित्रपट आपल्यासमोर निखळ विनोदाची पेरणी करतो.
कुसवडे नामक एका छोट्याशा गावात या चित्रपटाची कथा आकार घेते. देवासाठी ओवाळुन टाकलेला एक वळु- 'डुरक्या' हा या चित्रपटाचा खरा नायक. देवाचा बैल असल्याने कुठल्याही कामासाठी जुंपला न गेलेला, खर्या अर्थाने स्वतंत्र जीवन जगणारा हा डुरक्या म्हणजे आपल्याच मस्तीत जगणार्या, स्वातंत्र्याचा उपभोग घेणार्य स्वछंदी माणसाचे प्रतिक होय. अर्थातच अशा माणसाचा हा निखळ आनंद समाजाला मान्य नसतो. त्याच्या वाटेत अनेक काटे पेरण्याची समाजाची मनोवृत्ती असते. म्हणुनच सुरवातीला सार्या गावाचा लाडका असणार्या या वळुचे स्वच्छंदी जीवन गावकर्यांच्या डोळ्यात खपु लागते. मग त्याच्याविषयी अफवा पसरविण्याचे काम गावातीलच काही विघ्नसंतोषी लोकांकडुन सुरू होते. कित्येक गावकरी मग आपल्या दुष्कृत्यांचे खापर डुरक्याच्या डोक्यावर फोडुन वहात्या गंगेत हात धुऊन घेतात. आता या वळुची प्रतिमा गावकर्यांसमोर एक त्रासदायक जनावर अशी झालेली असते. मग या वळुला जेरबंद करण्याचे श्रेय घेण्यासाठी गावातील दोन गटांमध्ये स्पर्धा सुरु होते. अशातच या वळुला पकडण्यासाठी वनाधिकार्याला पाचारण केले जाते. मग त्या वनाधिकार्याची वळुला पकडण्यासाठी सुरू झालेली धडपड, त्यात गावकर्यांनी घातलेला गोंधळ नी यातुन घडणार्या गमती-जमतींचे चित्रण म्हणजे या चित्रपटाची कहाणी होय.
जगाची पर्वा न करता आपल्याच मस्तीत जगणार्या स्वच्छंदी माणसाचे प्रतिक म्हणुन हा वळु सतत आपल्यासमोर येत रहातो. या चित्रपटातील गावकरी म्हणजे अशा माणसाचा आनंद न बघावणारा आपला समाजाचे प्रतिक बनतात नी यातील प्रत्येक व्यक्तिरेखा समाजातील वेग-वेगळ्या प्रवृत्तीच्या लोकांचे प्रतिक बनुन आपल्यासमोर साकार होते. या चित्रपटाची कहाणी जरी या वळुभोवती एकवटलेली असली तरी आपल्यासमोर ही कथा साकार होताना समाजातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक जीवनाचे विविध पदर आपल्यासमोर उलगडले जातात.कथेच्या प्रवाहाला कुठेही धक्का न लावता या सार्या गोष्टी प्रभावीपणे प्रेक्षकांसमोर मांडण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरलाय.
या चित्रपटाला तगडी स्टारकास्ट लाभलेली आहे. वरवर कडक शिस्तिचा वाटणारा पण मनातुन सर्वसामान्य माणसाइतकाच भावुक असणारा वनाधिकारी 'अतुल कुलकर्णीने' सुंदर साकारला आहे. या व्यक्तिरेखेवर त्याने घेतलेली मेहनत आणि ती पडद्यावर साकारताना दिसुन येणारी उर्जा खरोखरच लाजवाब! 'दिलीप प्रभावळकर', 'मोहन आगाशे', 'अमृता सुभाष', 'निर्मिती सावंत', 'नंदु माधव' अशा चित्रपटसृष्टीतील कसलेल्या कलाकारंचा अभिनय पडद्यावर अनुभवणे म्हणजे एक वेगळाच थरार जाणवतो. या चित्रपटाचा खरा नायक 'वळु' असल्याने मुख्य फोकस त्याच्यावरच केंद्रीत झाला असला तरी आपल्या वाट्याला आलेल्या छोट्या भुमीकेतही सार्याच कलावंतांनी प्राण ओतलाय. विशेषतः अमृता सुभाषने साकारलेली 'तानी' नी दिलीप प्रभावळकरांचा 'बहिरा भटजी' अविस्मरणीय ठरतो!
तांत्रीक पातळीवर या चित्रपटाचि कामगिरी खरोखरच उत्कृष्ठ झालि आहे. 'गिरणी' या सुमारे ११ आंतरराष्ट्रीय पारितोषिक विजेत्या लघुपटानंतर सुमारे दोन वर्षांनी दिग्दर्शक 'मंगेश कुलकर्णी' हा चित्रपट घेउन रसिकांसमोर आला आहे आणि व्यावसायिक चित्र्पटस्रुष्टीतील त्याचे हे प्रदर्शन दृष्ट लागावी इतके अप्रतिम झाले आहे. कथेचे विविधांगी पदर उलगडताना कथानकाच्या मुख्य प्रवाहाला त्याचा धक्का लागणार नाही याची त्याने फार सुंदर काळजी घेतली आहे. फ्लॅशबॅकच्या माध्यामातुन वळुचा इतिहास दर्शकांसमोर मांडण्याची त्याची पध्दत फारच प्रभावशाली ठरते. चित्रपट बघत असताना कथानक, ग्रामीण जीवन, भाषा नी चित्रपटाची मांडणी यांवर त्याने घेतलेली मेहनत आणि त्याचा अभ्यास क्षणोक्षणी दिसुन येतो. 'मंगेश धाकडे' ने पदार्पणातच उत्कृष्ठ पार्श्वसंगीत देऊन आश्वासक पदार्पण केले आहे. त्याचे संगीत चित्रपट अधिक प्रभावशाली करण्यात मोलाची भुमिका बजावते. विशेषतः वळुचे थिम म्युझीक चित्रपट संपला तरीही प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः कोरले जाते. कला, छायाचित्रण नी रंगभुषेच्या पातळीवरही या चित्रपटाची कामगिरी उल्लेखनीय ठरते.
वरवर पहाता हा चित्रपट विनोदि वाटला तरी वैयक्तिक जीवनापासुन सामाजिक जिवनापर्यंत सर्वसामान्य माणसाची होणारी घुसमट या चित्रपटातुन प्रभावी पध्दतीने मांडली गेली आहे. चित्रपटातील बहुतेक पात्र, घटना या कशाचे ना कशाचे प्रतिक आहेत. पण या गोष्टी कळल्या नाहीत तरी सामान्य प्रेक्षकाला हा चित्रपट निखळ विनोदी चित्रपटाचा आनंद देउन जातो. व्यावसायीक गणितांवर यशस्वी ठरत असतानाच जाणकार प्रेक्षकालाही परिपुर्ण चित्रपटाचा आनंद देण्याची क्षमता, हे या चित्रपटाचे सर्वात मोठे बलस्थान म्हणायला हवे. म्हणुनच हा 'वळु' रसिकांना चित्रपटगृहाकडे 'वळवेल' यात आम्हाला शंका वाटत नाही! |